लोककथेतील स्त्री प्रतिमा : सामाजिक जडणघडीतून मानसिकतेपर्यंतचा प्रवास
===============================================================
लोककथा या मानवाच्या सामूहिक चेतनेचा आणि सांस्कृतिक स्मृतीचा अमूल्य ठेवा आहेत. त्या केवळ मनोरंजनासाठी सांगितल्या जात नसतात; त्या जीवनमूल्ये, सामाजिक रचना, नैतिकतेचे मापदंड, आणि विशेषतः स्त्री-पुरुष संबंधातील अपेक्षा यांचे आरसे असतात. या कथा एका विशिष्ट सांस्कृतिक पार्श्वभूमीत जन्मलेल्या असून, त्या त्या समाजाच्या मानसिकतेचे प्रतिबिंबही असतात. लोककथांमध्ये स्त्रीची जी प्रतिमा उभी राहते ती समाजाच्या तिच्याबद्दलच्या दृष्टिकोनाचा आरसा असते, आणि त्या प्रतिमांमधून स्त्रीचे स्थान, तिची भूमिका, तिच्यावर लादलेल्या मर्यादा आणि तिला मिळालेला सन्मान अथवा उपेक्षा या सर्वांचा धांडोळा घेता येतो.
लोककथांमध्ये स्त्री ही कधी देवी असते, कधी सती, कधी माय-माऊली, तर कधी एक निपचित बलिहारी देणारी, नशिबावर जगणारी अबला. पण या सर्व प्रतिमांचा केंद्रबिंदू असा की स्त्री ही स्वतःहून निर्णय घेणारी, आपली ओळख स्वतः घडवणारी नसते. तिचं अस्तित्व इतरांच्या संदर्भात परिभाषित केलं जातं—पतीच्या रूपाने, पित्याच्या रूपाने किंवा मुलांच्या दृष्टिकोनातून.
स्त्रीची देवीरूप प्रतिमा ही आदर्श आणि अतिमानवी रूप धारण करणारी असते. लोककथांमध्ये देवीच्या रूपातील स्त्री ही संकटसमयी अवतरते, राक्षसांचा वध करते, आणि समाजातील अन्यायाला शिक्षा देते. अशा स्त्रीला पूजनीय मानले जाते, पण ती प्रत्यक्षातील स्त्री नाही. ती एक कल्पना असते—समाजाने स्त्रीकडे कसे पाहावे, याचे आदर्श चित्र. परंतु ही पूजनीय प्रतिमा सुद्धा स्त्रीला एका चौकटीतच अडकवते. ही चौकट म्हणजे—ती सर्वगुणसंपन्न असावी, सर्वांचा उद्धार करणारी असावी, परंतु स्वतःसाठी काही मागणारी नसावी. ती रक्षणकर्ती आहे, पण तिला कोणी रक्षण करणार नाही. समाज तिच्यावर श्रद्धा ठेवतो, पण तिला माणूस मानत नाही.
दुसऱ्या बाजूला सतीचे रूप येते. सती सावित्री, सती अनुसया, दमयंती, सीता, या कथा स्त्रीच्या समर्पणाचे, त्यागाचे, निष्ठेचे उदात्तीकरण करतात. ‘पती म्हणजेच देव’, हे संकल्पनात्मक बीज या कथांमध्ये खोलवर रुजलेले आहे. स्त्रीचे आयुष्य म्हणजे पतीसाठी जगणे, त्याचे कल्याण हेच आपले अंतिम ध्येय मानणे, हे या प्रतिमेचा मूळ गाभा आहे. सतीपण हे तिचे परम सौंदर्य मानले गेले आहे. पण या सतीच्या प्रतिमेत स्त्रीची स्वतःची इच्छा, स्वप्ने, आकांक्षा या गोष्टी हरवून जातात. तिच्या स्वतंत्र अस्तित्वाला काही अर्थच राहत नाही.
लोककथांमध्ये ही सतीपणाची प्रतीमा इतकी खोलवर बसलेली आहे की, ती घराघरातल्या मुलींपासून वृद्ध स्त्रियांपर्यंत सर्वांच्या वर्तनाचा भाग होते. हे एक मानसशास्त्रीय conditioning आहे—स्त्रीने निःस्वार्थ, समर्पित, सहनशील, त्यागी असावे. ती रडू शकते, पण रागावू शकत नाही; ती सहन करू शकते, पण विरोध करू शकत नाही. अशा कथांमधून एकत्रितपणे अशी मानसिकता तयार होते की, स्त्रीने इतरांच्या हितासाठीच जगावे, स्वतःसाठी नव्हे.
पण या चित्रात सगळेच काळे नाही. काही लोककथांमध्ये स्त्री बंड करते, संकटांवर मात करते, वेषांतर करून संकटातून सुटते. उदा. काही आदिवासी लोककथांमध्ये स्त्री शिकारी जाते, राक्षसाशी लढते, घराचे नेतृत्व करते. या कथा स्त्रीच्या बुद्धीची, धैर्याची, आत्मनिर्भरतेची गाथा सांगतात. पण तरीही, या स्त्रीचे बंड मुख्यतः सामाजिक समंजसतेच्या चौकटीतच असते. ती स्वतःसाठी बंड करत नाही; ती पतीला वाचवण्यासाठी, कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी, किंवा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभी राहते. तिचे क्रियाशीलपणही ‘दुसऱ्यांसाठी’ या चौकटीतच बांधलेले असते.
स्त्रीचे सौंदर्य, तिच्या शरीराचे वर्णन, तिच्या गुणवैशिष्ट्यांचा उच्चार या सर्व बाबतीत लोककथांमध्ये एक पद्धतशीर नजर तयार केली जाते. 'सुंदर' स्त्री म्हणजे गोरी, नाजूक, कमनीय, नम्र असावी अशी कल्पना वारंवार पेरली जाते. ज्या कथा 'काळ्या', 'ठिंगण्या', 'बोलक्या' स्त्रियांबद्दल बोलतात, त्यामध्ये ती स्त्री बहुधा नकारात्मक रूपात दाखवली जाते. ही एक प्रकारची सौंदर्य-राजकारणाची चौकट आहे, जी केवळ बाह्य देखणपणावर स्त्रीच्या समाजातील स्थानाचा निर्णय करते.
लोककथांमध्ये सासवा-सून, दोन पत्नी, सावत्र आई, बहिणी यांच्यातील संघर्षही सतत दिसून येतो. हे संघर्ष केवळ व्यक्तिगत नसून त्यामागे स्त्रीला एकमेकींशी तोडून टाकण्याचे, पुरुषसत्ताक व्यवस्थेचे डावपेच असतात. स्त्रियांनी एकमेकींचा हात धरावा, याऐवजी त्या एकमेकींशी स्पर्धा करतात, हेच पुरुषसत्तेचे यश ठरते. या कथांमधून एक संदेश मिळतो—स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची शत्रू आहे. सावत्र आई ही संपूर्ण कथांमध्ये एक धोकादायक, दुजाभाव करणारी, वाईट स्त्री म्हणून दिसते. ही एक रूढ प्रतिमा आहे जी स्त्रीच्या विविध रूपांना स्वीकारण्याऐवजी त्यांचं खलनायकीकरण करते.
या कथांमध्ये कधी स्त्री एक परी असते—अलौकिक सौंदर्याने सजलेली, एका झाडातून, कमळातून, फुलातून जन्मलेली. ती जणू पुरुषाच्या आयुष्यात येते आणि त्याच्या जीवनाला अर्थ देते. ती प्रेम देते, पण शेवटी परत जाते, विरहाची भावना निर्माण करून. तिचं स्वतःचं घर, इतिहास, दु:ख, आयुष्य कुठेच दिसत नाही. ती फक्त पुरुषाच्या जीवनात ‘येण्यासाठी’ निर्माण केलेली एक अतिरंजित कल्पना असते. अशा परीकथा स्त्रीला एक ‘पुरुष केंद्रित स्वप्न’ बनवतात.
बालिकांशी संबंधित लोककथांमध्ये एका वयाच्या आधीपासूनच मुलींना उपदेश दिला जातो—तू मोठी झालीस की तुझं लग्न होईल, तू चांगली असलीस तर तुला राजकुमार मिळेल, तू वाईट असलीस तर तुझं नशीब वाईट असेल. चांगली मुलगी ही आज्ञाधारक असते, कामसू असते, शांत असते, आणि स्वप्ने पाहात नाही. या कथांमध्ये मुलींचं शिक्षण, त्यांची मतं, त्यांचे शरीर यांच्यावर एक अदृश्य नियंत्रण असतं.
असे असले तरी काही आधुनिक काळातील लोककथांची पुनर्व्याख्या झालेली आढळते. आजच्या लेखक-लेखिका, कथाकथनकार, चित्रकार आणि रंगभूमीवरील प्रयोगकर्ते स्त्रीच्या पारंपरिक प्रतिमांना मोडून तिच्या नव्या, वैयक्तिक आणि सशक्त रूपांना समोर आणत आहेत. ‘द्रौपदी’ला एक बळी ठरलेली स्त्री न मानता अन्यायाविरुद्ध उभी राहणारी योद्धा म्हणून मांडले जात आहे. ‘सीता’ ही आज्ञाधारक पतिव्रता न राहता, ‘निर्णय घेणारी स्त्री’ म्हणून दाखवली जात आहे.
या पुनर्पाठांमधून एक गोष्ट अधोरेखित होते—लोककथा म्हणजे स्थिर, कालबाह्य गोष्टी नसून त्या सतत नव्याने अर्थ लावल्या जाणाऱ्या, समाजाच्या बदलत्या विचारप्रवाहांना सामावून घेणाऱ्या कथा आहेत. स्त्रीची प्रतिमा जशी काळानुसार बदलू लागली, तसा या लोककथांमध्येही नव्या स्त्रीचे दर्शन घडू लागले.
पण तरीही, ग्रामीण भारतात, लहान गावांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये आजही त्या पारंपरिक लोककथा सांगितल्या जातात—ज्यामध्ये स्त्रीला त्याच जुन्या चौकटीत बसवलेले असते. त्यामुळे लोककथांची समकालीन पुनर्व्याख्या ही केवळ बौद्धिक स्तरावर न राहता ती सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचा भाग व्हावी लागेल.
हे सर्व पाहता, लोककथांमधील स्त्री प्रतिमा ही केवळ साहित्यिक विषय नाही, तर ती सामाजिक मानसिकतेचा आरसा आहे. ती समाजाने स्त्रीकडे कसे पाहिले, तिच्याकडून काय अपेक्षा ठेवल्या, तिला कोणत्या मर्यादांमध्ये ठेवले, आणि तिने त्या संकल्पनांशी कसे जुळवून घेतले किंवा बंड केले, याचा एक सखोल दस्तऐवज आहे.
आजच्या स्त्रीने या लोककथांतील प्रतिमांकडे फक्त आदराने न पाहता, चिकित्सक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. त्या प्रतिमांमधून काय शिकलो, काय चुकीचे शिकवले गेले, आणि त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, हे तपासणे महत्त्वाचे आहे. स्त्रीला देवी मानण्याऐवजी माणूस म्हणून स्वीकारणे—हेच खरे लोककथांचे आधुनिक पुनर्पाठ होईल.
वर्षा पतके थोटे
८ जुलै २ ० २ ५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा