सोमवार, १५ जुलै, २०२४



साधारण मार्च ते जून हे महिने लग्न करण्यासाठी सोयीस्कर मानले जायचे. आता चित्र वेगळं आहे. आता लग्नाला पसंती ही हिवाळ्यात जास्त दिली जात असली तरी अजूनही सुट्ट्यांमध्ये लग्न करणं जास्त सोयीचं म्हणून भर उन्हाळ्यात लग्न होतच आहेत. आमच्या वेळी सर्वात जास्त लग्न व्हायचे ते मे महिन्यात. गर्मी म्हणते 'मी आहे तर कोणी नाही', आणि व-हाडातले व-हाडी म्हणत ' तुले काय आमी घाबरतो काय, तुया सारखे लय पायले छप्पन', नाकाचा शेंबुड पुसत आंब्याच्या लूंचीवर ताव मारत असत. खरी कसोटी लागे ती नवरीची. एवढ्या गर्मीत भारी भरकम शालू घाला, त्यावर डोक्यावरून ओढणी घ्या, स्नो-पावडर तर कोणत्या पतल्या गल्लीनं पळत जाये कोण जाणे, लाल- पांढरे गंधाचे ठिपके तर कधी घामाच्या थेंबात एकजीव होऊन जात कळत नसे अन् मग नवरीचा चेहरा जेवढा वाईट करता येईल तेवढा गर्मीचा प्रयत्न असे. त्यात गावातल्या बुढया बाढ्या नवरीकडे निरा एकटक पाहत असत. काय पाहत असत ह्या म्हाता-या कोता-या नवरीकडे. तर नवरीच्या डोळ्यात येणारे अश्रू. त्या नवरीच्या डोळ्यात येणारे अश्रू दिसले की, आजीबाई खुश होऊन आपलं लग्न आठवत असत. नव्वद टक्के नवरीच्या डोळ्यात अश्रू राहायचेच. पण एखादी नवरी दहा टक्क्यांत मोडणारी असलीच म्हणजे तिच्या डोळ्यात नाहीच आलं गंगामायचं पाणी तं बुढ्या बाढ्याईची कुचकुच सुरू होत असे. ' माय पायनं केवढी हरिकली नवरी लग्नाले, आमी कितीक धायमोकलून लळलो अशीन, आमचं आमालेच मालूम? लयचं दिसते वं नवरी '. पूर्ण लग्नात बायकांची एकच कुचकुच सुरू असे. त्यात नवरी जर चार दोन बुकं शिकली असली तर मग तर विचारूच नका. शिकलेल्या पोरी बिघडतात अन् लग्नात रडत पण नाही म्हणून आमची कासाआजी नवरीच्या तोंडावर म्हणून मोकळी व्हायची. पण आता चित्र फार बदललं. आणि हा बदल खरंच खूप छान आहे. नवरी लग्नात पूर्णवेळ आनंदी, हसरा चेहरा घेवून वावरत असते. त्यामुळे त्या लग्नाला दुःखाची किनार राहत नाही. नाहीतर आधी लग्न म्हणजे दुःखाचा डोंगर. जो जन्मभर डोक्यावर उचलून चालायचा आहे असं वाटायचं..मे महिन्यात उगाच असं काहीबाही आठवत राहतं😀
*वर्षा पतके थोटे
३१/मे/२०२४
फोटो गुगलवरून

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>



 

बुधवार, १० जुलै, २०२४

  गाणे जात्यावरचे

*******************

माझी आत्या चांगली ९१ वर्षांची होऊन मरण पावली. ती ९१ वर्षांपर्यंत अगदी ठणठणीत होती. फक्त मरणाच्या आठ दिवस आधी बाथरूम मध्ये पडण्याचं निमित्त झालं आणि एका अंगावरून तिला लकवा गेला. लकवा गेल्यावर ती आठ दिवसांत गेली. आत्याचा माझ्यावर खूप लोभ होता आणि माझा तिच्यावर. ती माझ्या बालपणी आमच्याकडे उन्हाळ्यात आणि दिवाळीत दरवर्षी स्वतःहून यायची. कारण तिच्यापेक्षा माझे बाबा चांगले ९-१० वर्षाने लहान होते आणि तिने त्या दोघांची आई मेल्यावर आई सारखं माझ्या बाबांना सांभाळलं होतं. म्हणून ती मोठी बहीण म्हणून आईच्या मायेने बाबांशी आणि आमच्या परिवाराशी वागत राहिली. बाबांनी पण कधी तिला अंतर दिलं नाही. कारण ही दोघचं बहीण भाऊ एकमेकांचा आधार होते. मला माझी आत्या गावाला आली की फार आवडायचं. कारण ती आली की, पहाटे पाच वाजता उठून जात्यावर गाणे म्हणत गहू दळत असे, कधी तुरीची, मुगाची, उडदाची डाळ भरडत असे. आईबाबा तिच्या सोबत उठलेले असत. पण मी मात्र तिच्या जात्यावरच्या गोड गाण्याने जाग आली तरी अंथरूणात पडून असे. ती कशी काय एवढं सुंदर गाणं गात असे कोण जाणे ? पण ती बरोबर यमकाला यमक जुळवून व-हाडी बोलीत गात असे. त्या गाण्यात कधी देवाला आळवणी असे, कधी लटका राग असे, कधी संसाराचं दुःख असे, तर कधी देवाजवळ गा-हाणं मांडलं जाई. पण या सगळ्यात मात्र ती आपलं माहेर, आपला भाऊ, भावजय, दोन्ही भाच्या उच्चकोटीला नेवून ठेवत असे. माझे बाबा शिक्षक होते आणि घरी वावराचं धनधान्य पाहून खूप आनंदी व्हायची. तेव्हा ती माहेराबद्दल गाण्यात म्हणायची....
जात्या इसवरा तू त जंगलाचा ऋषी
मानाचा फतवा गाते तुह्या पसी
मपलं माहेर कृष्ण देवाची द्वारका
वाडा भरून भावजया मेळा गवळणी सारखा
काय सांगू बाई मह्या माहेरचं सुख
पाण्यातले जाता येता दिसे मारूतीचं मुखं
इठून दिसतो मह्या माहेरचा निंब
निंबाले साखळदंड झोका खेळे पांडुरंग
वाटच्या वाटसरा काय पाह्यतू खेड्याले
सोन्याचं कुलूप मह्या बंधुच्या वाड्याले...
आई म्हणायची काय बाई केवढं तुम्हाले माहेराचं कौतुक आहे. आत्या म्हणायची 'पांडुरंगानं मले सोन्या सारखं माहेर माया भावाच्या रूपानं दिलं, मंग त्याचा गोडवा आपसुक ओठावर येतो भावजयी'. माझी आत्या मी अकरावी बारावीला जाईपर्यंत जात्यावर काही ना काही दळत असे. शेतक-याच्या घरात काही ना काही जात्यावर दळावचं लागे नाहीच काहीतर करंजी साठी लागणारे ओलवले गहू तरी ती दळायची. तिचं आणि जात्याचं एक घट्ट समीकरण तयार झालं होतं. तिच्या गाण्यातून तिने मला खूप आत्मिक आनंद दिला होता. बरं ते गाणे ती स्वतःच रचायची. जात्यावर बसली की तिला कसं काय गाणं सुचायचं कोण जाणे ? आता कळतंय ती तिची सृजनाची समाधी अवस्था असावी. पण मला समजायला फार वेळ लागला नाहीतर मी सगळं लिहून घेतलं असतं. पण तरीही काही काही मला आठवतं हाच काय तो एक आत्याला स्मरण्याचा एक आनंद असतो. तिच्या कवितेसारखे गाण्याच्या स्वरूपात ....आत्या अगदी आमच्याकडे शेवटपर्यंत आली. फक्त तिची एकच इच्छा होती की मी माझ्या भावाच्या आधी मरणाच्या दारात जावं. पण नियती आपलंच खरं करते. माझे बाबा गेल्यावर ती पार खचली पण तसं ती दाखवत नसली तरी बाबा पहिल्याच हार्ट अॅटकने अचानक गेल्यावर सहा महिन्यांत ती पण गेली. चंद्रकला नाव कसलेली माझी आत्या तिच्या गावतल्या चंद्रकला नदीत विलिन झाली. नदीचं आणि तिचं प्रवाही असणं माझ्यातही आलं आहे. बहीण भावाचं नातं कसं असावं तर माझ्या आत्या आणि बाबांसारखं असं आमचं गाव अजूनही म्हणते.........तर अशा कवी असलेल्या आत्याची मी एक कवी भाची....
©वर्षा पतके थोटे
८ जुलै २०२४





<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>