लोककथेतील स्त्री प्रतिमा : संस्कृती, मिथक आणि वास्तवाच्या सीमारेषा
=====================================================
लोककथा ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्या समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि मानसिक रचनेचे प्रतिबिंब असतात. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या या कथांमध्ये जीवनाचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न तर असतोच, पण त्याचबरोबर समाजात प्रस्थापित असलेल्या रूढी, परंपरा आणि मूल्यव्यवस्थांचा ठसा स्पष्टपणे उमटलेला दिसतो. या लोककथांमध्ये स्त्रीचे स्थान, तिचे रूप, तिची भूमिका ही केवळ एक व्यक्तिरेखा म्हणून नव्हे, तर समाजाच्या दृष्टिकोनाचा आरसा ठरते. लोककथेतील स्त्री प्रतिमा ही अनेक स्तरांवर भाष्य करणारी आहे — ती देवीही आहे, सतीही आहे आणि माणूस म्हणून तिची ओळखही आहे. ही प्रतिमा स्त्रीच्या अस्तित्वाशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करत असते.
भारतीय लोकपरंपरेत स्त्री ही अनेकदा दुय्यम स्थानावर असली तरी लोककथांमध्ये ती केवळ पार्श्वभूमीतील पात्र म्हणून न राहता कथानकाची दिशा ठरवणारी केंद्रस्थानी व्यक्ती ठरते. तिच्या भोवती कथानक गुंफले जाते, संकटांची मालिका तिच्यावर कोसळते आणि ती त्यातून मार्ग काढते. काही ठिकाणी ती चातुर्याने आणि कर्तबगारीने विजय मिळवते, तर काही ठिकाणी ती सहनशीलतेचा आणि त्यागाचा आदर्श ठरते. स्त्रीचे हे विविध पैलू — एकीकडे श्रद्धेची, भक्तीची मूर्ती, तर दुसरीकडे समाजाच्या नियमांमध्ये अडकलेली अबला — हे तिच्या सामाजिक भूमिकेचे विविध पदर उलगडतात.
लोककथांमध्ये स्त्रीची प्रतिमा अनेकदा पारंपरिक भूमिकांशी बांधलेली दिसते. तिचे कार्यक्षेत्र घरापुरते मर्यादित असते, ती सासरच्या घराची शोभा असते, पतिव्रता असते, मुलांच्या संगोपनासाठी स्वतःला वाहून घेणारी असते. या भूमिकांमध्ये तिचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व हरवत जाते. तिच्या इच्छा, आकांक्षा, मत, निर्णय यांना फारसे स्थान नसते. परंतु हाच समाज जेव्हा स्त्रीच्या धैर्याचे, बुद्धीचातुर्याचे आणि पराक्रमाचे उदाहरण देतो, तेव्हा कथांमध्ये ‘सावित्री’, ‘सीता’, ‘अनसूया’ यांसारख्या व्यक्तिरेखांना नवा अर्थ प्राप्त होतो. या व्यक्तिरेखा एकीकडे आदर्श पतिव्रता म्हणून दाखवल्या जात असल्या तरी त्यांचा संघर्ष, त्याग आणि आत्मशक्ती देखील समाजासाठी प्रेरणादायक ठरतो.
लोककथांमध्ये स्त्रीची प्रतिमा अनेकदा दैवी किंवा अलौकिक रूपातही साकार होते. देवी म्हणून तिची पूजा केली जाते, तिच्या चमत्कारिक शक्तीवर विश्वास ठेवला जातो. ती संकटमोचक असते, ती ग्रहदशा सुधारणारी असते. यामुळेच ग्रामीण भागात अनेक देवीच्या लोककथा आढळतात — जसे की ‘तुळजाभवानीची कहाणी’, ‘कणकादेवीची गोष्ट’, ‘मरीआईची किमया’ इत्यादी. या कथांमधील स्त्री ही एक मायेचा अवतार असते आणि समाजाला दिशा देणारी शक्ती असते. मात्र, हाच समाज स्त्रीच्या मानवी रूपाला नेहमीच संकुचित चौकटीत ठेवतो. म्हणजेच, तिच्या दैवी अस्तित्वाला मान्यता असली तरी तिच्या मानवी अस्तित्वाला तितकसं स्वातंत्र्य मिळत नाही.
स्त्रीचे सौंदर्य हे देखील लोककथांमध्ये एक महत्त्वाचा घटक ठरतो. सुंदर मुलीवर संकट येते, तिच्या रूपामुळे ती राजाची राणी बनते किंवा दुसऱ्या स्त्रियांचा हेवा निर्माण होतो. हे सौंदर्य तिचे वरदानही ठरते आणि संकटाचे मूळही. अशा कथांमध्ये तिची पात्रता, गुण, बुद्धीपेक्षा तिच्या रूपालाच प्राधान्य दिले जाते. दुसरीकडे, कुरूप किंवा साधी दिसणारी स्त्री ही सहसा दुय्यम पात्र ठरते. त्यामुळे सौंदर्य ही स्त्रीची पात्रता ठरवणारी महत्त्वाची निकष बनते — जी संपूर्ण समाजाच्या मानसिकतेचा आरसा असतो.
लोककथांमध्ये सासू-सून, नवरा-बायको, बहिण-भावा, बहीण-बहिणी या नातेसंबंधांच्या माध्यमातून स्त्रीचे स्थान ठरवले जाते. सासू बहुधा अत्याचारी, सूनेवर अन्याय करणारी दाखवली जाते, तर सून ही सहनशील, नम्र, कष्टाळू असते. या नात्यात सासूचे वर्चस्व आणि सूनेचे कर्तव्य ठरवलेले असते. हे चित्र लोककथांमधून सतत पुनरावृत्त होते, त्यामुळे समाजाच्या मनावर त्याचा ठसा उमटतो आणि प्रत्यक्ष जीवनातही त्याची पुनरावृत्ती होते. याउलट काही कथांमध्ये सासू-सून एकमेकींच्या मदतीला धावून जातात, संकटातून एकमेकींना सावरतात आणि हे दाखवतात की स्त्री-स्त्री संबंध केवळ संघर्षात्मक नसतात, ते सहकार्याचे आणि सर्जनाचेही असू शकतात.
पतिव्रतेची प्रतिमा लोककथांमध्ये अतिशय ठळकपणे रेखाटलेली आहे. पतीच्या मृत्यूनंतरही त्याच्यासाठी प्रयाण करणारी, यमराजालाही नमवणारी सावित्री ही या प्रतिमेचे मूर्तिमंत उदाहरण ठरते. ही स्त्री तिच्या पतीच्या प्रेमासाठी सर्वस्व त्याग करते, अग्निपरीक्षा देते, वनवास भोगते, गार्हाणं न करता समाजाच्या नियमांना मानते. ह्या कथा ऐकतांना किंवा सांगतांना स्त्रीने पतिव्रतेसारखे राहावे, सहन करावे आणि त्याग करावा हे अप्रत्यक्ष शिकवले जाते. यामुळेच लोककथा स्त्रीच्या चारित्र्यविषयक अपेक्षांना अधिकाधिक बळ देतात.
या चित्राच्या विरोधात काही कथांमध्ये मात्र स्त्री ही स्वावलंबी, साहसी, युक्तीने संकटावर मात करणारी दिसते. उदा. "सात बहिणींची गोष्ट" किंवा "शहाणी बायको" अशा कथांमध्ये ती एका साध्या स्त्रीहून अधिक होऊन परिस्थितीवर प्रभुत्व मिळवते. तिला मदत करणारे प्राणी, झाडे किंवा कोणी वृद्ध पात्र असते, जी तिच्या चांगुलपणामुळे तिला सहाय्य करते. या गोष्टींमधून एक प्रकारचा नैतिक संदेशही दिला जातो — चांगुलपणा, सहानुभूती, संयम आणि कष्ट हे स्त्रीच्या यशाचे साधन आहेत. परंतु येथेही लक्षात घेण्यासारखे आहे की, स्त्रीने सर्व संकटे पार करून यश मिळवावे लागते, म्हणजेच तिच्या मार्गात अडथळे येणारच हे गृहीत धरलेले असते.
लोककथांमध्ये स्त्री ही इतर स्त्रियांची शत्रू म्हणूनही उभी राहते. तिच्या सौंदर्यावर, सुखावर किंवा सन्मानावर डोळा ठेवणाऱ्या दुसऱ्या स्त्रिया — म्हणजे सौतेवी आई, जळणारी बहिण किंवा द्वेष करणारी सासू — यांचे चित्र वारंवार दिसते. या प्रतिमा समाजात स्त्री-स्त्रीमध्ये असणाऱ्या संघर्षाचे प्रतीक ठरतात. परंतु हा संघर्ष केवळ वैयक्तिक नसून त्यामागे असणाऱ्या सामाजिक-सांस्कृतिक रचनेचा प्रभावही महत्त्वाचा आहे. कारण ही स्त्रिया त्या समाजव्यवस्थेचाच भाग आहेत जिथे स्त्रीला एकमेकींशी स्पर्धा करावी लागते — प्रेम, संपत्ती, सन्मान, स्थान यांच्या लढाईत.
काही लोककथा अशा असतात जिथे स्त्री ही स्त्रीच्या मुक्ततेचे, स्वप्नांचे आणि इच्छांचे प्रतीक बनते. ती घराबाहेर पडते, अज्ञात प्रवास करते, स्वतःचे अस्तित्व शोधते. अशा कथांमध्ये तिचा संघर्ष केवळ बाह्य नसून अंतर्गतही असतो. उदा. काही आदिवासी लोककथांमध्ये स्त्री ही जंगलात जाऊन देवतेशी संवाद साधते, नव्या ज्ञानाच्या शोधात असते. ती स्वतंत्र निर्णय घेते, कधी कधी प्रचलित नियम झुगारते. अशा कथा फारच थोड्या प्रमाणात आढळतात, पण त्या स्त्रीच्या आंतर्यात्रेचा, स्वत्वाच्या शोधाचा प्रत्यय देतात.
स्त्रीची प्रतिमा ही समाजाच्या मानसिकतेप्रमाणे सतत बदलत जाते. त्यामुळे आजच्या स्त्रीच्या दृष्टीने या लोककथा नव्याने वाचणे गरजेचे आहे. आपण त्या कथांमध्ये स्त्रीला केवळ देवी वा अबला म्हणून पाहणे थांबवून तिच्या पूर्ण मानवी अस्तित्वाचा विचार केला पाहिजे. तिच्या भावभावना, विचार, आस्था, निर्णयक्षमता या सर्वांचे जसे चित्रण व्हायला हवे तसे पूर्वीच्या कथांमध्ये अभावानेच दिसते. त्यामुळे आजच्या काळात या लोककथा नव्याने सांगणे, पुनर्लेखन करणे ही काळाची गरज आहे.
लोककथांमधील स्त्री प्रतिमा ही गुंतागुंतीची, बहुआयामी आणि अनेकदा विरोधाभासी आहे. ती भक्तीची मूर्ती आहे तर विद्रोही सुद्धा आहे, ती यमराजाशी झुंजणारी आहे तर सासरच्या घरात शोषितही आहे, ती देवी आहे पण तिचे माणूसपण ओळखले जात नाही. या सर्व प्रतिमांमधून समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तिच्या भूमिकांबद्दलची अपेक्षा दिसते. परंतु या प्रतिमा केवळ त्या काळाची चिकित्सा करण्याापुरत्याच मर्यादित न राहता आजच्या स्त्रीच्या स्वत्वाच्या शोधात उपयोगी पडणाऱ्या ठरतात, जर आपण त्या नव्या दृष्टीने समजून घेतल्या तर. म्हणूनच, लोककथांतील स्त्री प्रतिमा ही केवळ कालबाह्य आदर्शांची गुंफण नसून ती स्त्रीच्या अस्तित्वाचा ऐतिहासिक आरसा आहे — जो काळानुसार अधिक स्पष्ट, अधिक स्पष्टविवेकशील बनत आहे.
वर्षा पतके थोटे
१९ जुलै २०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा