गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

 

शक्तिरूपेण: संस्थितI

====================


पहिली माळ--- डाॅ. राणी राजवाडे


मी सर मोरोपंत जोशी यांची कन्या डाॅ. राणी लक्ष्मीबाई राजवाडे. माझा जन्म1887 मध्ये नागपूर मध्ये झाला. माझे बाबा सर्वसामान्य समाजसुधारक आणि स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा या मताचे होते. त्या काळी आम्हा तीघी बहिनींचे शिक्षण कलकत्याच्या काॅन्वेंट स्कुलमध्ये सामाजिक विरोधाला तोंड देत पूर्ण झाले.


  मी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर मुंबईच्या ग्रॅट मेडिकल काॅलेजमध्ये अॅडमिशन घेतली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी गोपाल कृष्ण गोखले यांच्या बरोबर इंग्लंडला गेली. पुढे अनेक डिग्री मिळवित असताना युरोपभर प्रवास झाला. पण अचानक पायाला ठेच लागावी तसा घरून निरोप आला. आईला बरं नाही म्हणून मायदेशी परत यावं लागलं.


मुंबई शहरात मी 14वर्ष डाॅक्टरकीचा व्यवसाय केला. सोबतच अखिल भारतीय महिला परिषदेचे कामकाजही पाहिले. त्यानंतर माझी अखिल भारतीय महिला परिषदेच्या कार्यवाहपदावर निवड झाली. त्यानंतर मी संस्थेची अध्यक्ष झाले. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय योजना आयोग महिला शिक्षणविभागाची मी प्रमुख झाले. तिथे स्त्रियांसंबंधी बरेच कामे केली. त्यातून जन्माला आले ते " स्त्रियांच्या मागण्या " हे पुस्तक.


स्त्रियांच्या कल्याणाच्या अनेक चळवळीत मी भाग घेतला. मला भारताच्या हस्त-कौशल्याच्या आणि निरनिराळ्या कलाकुसरी जमविण्याचा छंद होता. त्या संदर्भात मी सखोल वाचन करीत असे. आदीवासींच्या कलात्मक वस्तू , पितळेच्या दुर्मिळ वस्तू , कांग्रा , राजस्थान ,मराठा , ओरिसा विविध शैलीतील चित्रेसुद्धा मी जमा करून भिंतीवर लावीत असे.


मी त्या काळी ग्वाल्हेर राज्याचे मेजर जनरल राजा. जी. आर. राजवाडे यांच्याशी विवाह केला. त्यावेळी मेजर जनरल विधुर होते आणि त्यांना चार मुले आणि दोन मुली होत्या.


ग्वाल्हेरला मातीची कलात्मक भांडी बनविण्याचा कारखाना होता. त्याला मी योग्य मार्गदर्शन करून उपयुक्त डिझाईन्स उपलब्ध करून द्यायचे.


मी एक कधीही न थकणारी पर्यटक होते. पर्यटन करीत असतांना माझी दृष्टी  चौफेर असे. अशी सुक्ष्म दृष्टी ठेऊन मी भारतातल्या सर्व ऐतिहासिक आणि महत्वाच्या पुरातत्वीय ठिकाणांना भेटी दिल्या. या प्रवासात देवळात ठेवल्या जाणा-या 3000 प्रकारच्या दिव्यांची आणि ज्यांच्यावर सुंदर नक्षिकाम केलेले आहे , अशा पेट्यांची साठवण केली. या प्रवासात मला देवदेवतांची , प्राण्यांची, पशुपक्ष्यांची, काही डिझाईन्स मिळालीत. ती मी विणकरांना दिली. तीच आज साड्यांच्या पदरावर, काठावर अतिशय लोकप्रिय झाली आहेत.


मला ज्या विषयाचा छंद होता. त्या विषयावरची मी असंख्य पुस्तके लिहिलीत. मी मरण्याच्या काही दिवस अगोदर माझ्या छंदातून निर्माण झालेला संग्रह नवी दिल्ली येथील नॅशनल म्युझियमला देणगी स्वरूपात दिला.  मी वयाच्या 97व्या वर्षापर्यंत कार्यरत होते. पण मृत्यू कुणाला चुकलाय ? मी अखेरीस वयाच्या 97 वर्षात अखेरचा श्वास घेतला पण मी आजही माझ्या छंदातून जीवंत आहे.


©वर्षा पतके थोटे

7 /10/2021



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा