सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

 


शक्तिरूपेणः संस्थिता

==================


सातवी माळ---रूथ मनोरमा


मी रूथ मनोरमा. मद्रासच्या एका उपनगरात मी राहत होते. माझी आई स्त्रियांच्या शिक्षणाबाबत खूप आग्रही होती. तिने वडिलांच्या सनातनी विचारांना विरोध केला आणि ती शिक्षिका बनली. तिने यासाठी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. पंडिता रमाबाई तिच्या आदर्श होत्या म्हणून माझेही नाव पंडिता रमाबाईच्या मुलीचे जे नाव होते.  माझेही नाव तेच 'मनोरमा' ठेवण्यात आले.


माझे शिक्षण सायन्स मध्ये मद्रास येशील ख्रिश्चन काॅलेज मधून झाले होते.  त्यानंतर मी सामाजिक कार्याचे शिक्षण घेतले. स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थान हळूहळू विकासाचे कधी न पाहिलेले मार्ग चोखाळू लागला होता. तरूणवर्ग नवीन राजकीय तत्वज्ञानाशी परिचित होत होता. स्त्रियांच्या चळवळीमध्ये विशेषतः शहरी स्त्रियांच्या चळवळीमध्ये वाढ झाली होती. परंतु, हा संघर्ष स्त्रियांकरिता नवीन नव्हता.  पण स्वातंत्र्यानंतर स्त्रियांच्या या वेगवेगळ्या चळवळीने जोर धरला आणि 1975 हे वर्ष ' आंतरराष्ट्रीय महिलावर्ष ' आणि आंतरराष्ट्रीय महिलादशक ' म्हणून जाहीर करण्यात आले होते. 

त्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नाकडे जास्तीत जास्त राजकीय नेते, राजकीय कार्यकर्ते आणि विचारवंत जोडल्या गेले. याचबरोबर दलितांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होण्याला प्रारंभ झालेला होता.


सामाजिक कार्यातील डिग्री मिळविल्यानंतर मी एक वर्षभर नोकरी केली. पण मन रमेना. त्याच दरम्यान मद्रासला अकस्मात मोठा पूर आला. सैदपेट येथील दहीदीर नावाची विशाल झोपडपट्टी पाण्यात बुडाली. मी माझ्या सामाजिक कामाची सुरूवात येथूनच केली. माझ्या समोर पहिले काम म्हणजे तिथल्या रहिवाशांकरिता झोपड्या तयार करणे आणि त्यांना शिक्षण देणे हे होते. आम्ही ती झोपडपट्टी नव्याने उभारली. त्यानंतर मी 'ग्रेल'नावाच्या आंतरराष्ट्रीय स्त्रियांच्या संघटनेत सामील झाले. माझी नेमणूक बंगलोरला झाली. या संस्थेत मी सलग पाच वर्षे स्त्रियांच्या अनेक समस्यांवर काम केले.

 

त्यानंतर मी स्वतंत्रपणे काम करावे असे मला वाटू लागले. समाजातल्या खालच्या तळातल्या लोकांची एक संघटना करून त्यांना त्यांच्या अधिकारांकरिता संघर्ष देता येईल, अशी माझी पक्की धारणा होती. त्यानुसार मी 'महिलांचा आवाज'ही संघटना स्थापन केली. या संस्थेमार्फत आम्ही शहरातील गरिबांच्या गरजा यावर कामे करू लागलो. सोबतच मी ' नॅशनल सेंटर फाॅर लेबर ' या संस्थेशीसुद्धा निगडीत होते. ही संस्था असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हितसंबंधाचे रक्षण करीत असे.

 

अमेरिकेतील आफ्रो- अमेरिकन संबंध आणि हिंदुस्थानातील दलितांचे संबंध या विषयाचा मी विशेष अभ्यास करावा, असे सांगण्यात आले. माझ्या डोक्यात तसाही हा विषय होताच. त्यामुळे मी ह्या विषयाचा अभ्यास करायचे असे ठरविले. यामुळे मला तळागाळातील स्त्रियांचे प्रश्न आणि त्याची खोली कळणार होती. तसाही या दरम्यान दलित महिला, ख्रिश्चन दलित महिलांचा स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता आणि माझा या दृष्टीने सखोल अभ्यास सुरू झाला होता. हिंदुस्थानात दलित समाजातील स्त्रियांचा दर्जा विवादास्पद होता. या महिलांना अनेक प्रकारचे अन्याय सहन करावे लागत होते. या सा-यांचा उद्धार करावयाचा म्हणजे लोकातून निर्माण झालेल्या संघटनांची आवश्यकता होती. मी बंगलोर मध्ये " दलित स्त्रियांविरूद्ध जो हिंसाचार होतो त्याचे सार्वजनिक प्रगटीकरण " ही संस्था स्थापन केली. याचा परिणाम म्हणून दक्षिण हिंदुस्थानातल्या तळागाळातील स्त्रियांचे मोठ्यात मोठे शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन पोहचले. केंद्र सरकारने स्त्रियांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घ्यावेत आणि त्याकरिता धोरणे ठरवावीत , ह्या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्याकरिता हे शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. त्यानंतर सरकारने एक सल्लागार समिती स्थापन केली.

 

दलित प्रश्न आणि जातीजातीतला भेद हे प्रश्न मी आंतरराष्ट्रीय पातळीवर आणले तेव्हा मला अनेक संकटांना , समस्यांना , विरोधांना सामोरी जावे लागले. पण मी हार मानणारी नव्हते. मी या प्रश्नांना घेवून माझी चळवळ सुरूच ठेवली आणि एक दिवस मी हे प्रश्न  आंतरराष्ट्रीय पातळीवर आणू शकले. याचे मोठे समाधान मला लाभले. या सर्व कार्यात माझा नवरा , दोन मुली कायम सोबत होत्या. माझे घर नेहमीच तळागाळातील दरिद्री लोक , कामगार , विचारवंत , मित्र , कार्यकर्ते , विकास कार्यकर्ते, चळवळीतले लोक अशांनी नेहमीच गजबजलेले असे. मी हे कार्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून स्फूर्ती घेऊन सुरू करू शकले यात मला खूप धन्यता वाटते. दलितांचे एकमेव पुढारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दानूसार आमचा संघर्ष सत्ता किंवा संपत्ती या करिता नव्हता. तर तो मानवी व्यक्तिमत्व पुन्हा प्राप्त करण्याकरिता तो अविरत चाललेला संघर्ष होता.  


त्यानंतर माझी समाजात ओळख मानवी अधिकारांकरिता संघर्ष करणा-या नेत्या अशी होऊ लागली. मी कायमच स्त्रियांचे प्रश्न , असंघटित स्त्री- कामगारांचे प्रश्न , दलित स्त्रियांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर काम करीत राहीले. त्यामुळे मोठमोठे लोक अचंबित व्हायचे. पण मी माझे कार्य नेटाने करीत राहीले.


 मी " राष्ट्रीय महिला आघाडी " या संस्थेची अध्यक्ष झाले. त्याचबरोबर त्या ' महिलांचा आवाज ' या संस्थेची जनरल सेक्रेटरी झाले. 'नॅशनल फेडरेशन ऑफ दलित वुमेन 'या संस्थेची मी नॅशनल कन्व्हेनर होते.


मला कायमच वाटत आले होते की तरूण पिढीने आपल्या राष्ट्राच्या चिरंतन मूल्यांकडे जावे. स्वातंत्र्य मिळविण्याकरिता जुन्या पिढीने जो त्याग केला त्याची तरूणांनी कायम आठवण ठेवावी.





©वर्षा पतके थोटे

  13/010/2021

Pc--google



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा