शक्तिरूपेणः संस्थिता
====================
चौथी माळ---ज्योतिर्मयी देवी
मी ज्योतिर्मयी देवी. माझा जन्म संपन्न कुटूंबात 1894 झाला होता. माझे आजोबा जयपूर संस्थानचे पंतप्रधान होते, तर वडील कॅबिनेट मंत्री होते. माझा विवाह अगदी लहान वयात हायकोर्टात वकीली करणा-या तरूणाशी करण्यात आला. पंरतू वयाच्या केवळ 25व्या वर्षी मी विधवा झाले. पतिनिधनानंतर मी दोन मुलं आणि चार मुलींसह माहेरी जयपूरला आले. त्यावेळी माझा मोठा मुलगा दहा वर्षाचा आणि लहान मुलीचे वय केवळ तीन महिने होते.
आता मला परिस्थितीला सहजासहजी शरण जाऊन चालणार नव्हते. मी जीवनाला पुन्हा नव्याने सुरूवात करण्याचा निश्चय केला. माझे शिक्षण बंगाली आणि हिंदी भाषेतून झाले होते. पण मी कठोर मेहनतीने इंग्रजी आणि संस्कृत भाषेचे ज्ञान मिळविले.
जीवन सरळ रेषेत चालत असतांना एखादी रेषा एकाएकी तुटली तर, त्या रेषेवर इतका खोलवर घाव बसतो की, आयुष्याचे सगळै संदर्भ नाहीसे होतात. तसंच माझ्या बाबतीत पतिनिधनानंतर झालं होत. माझ्या एकूण जीवनावरच परिणाम झाला होता. दैनंदिन जीवन बदलून गेले होते. अशात-हेच्या संकटांनी माणूस फार हवालदिल होतो. ह्या घटनेचा स्त्री जीवना एवढा पुरूष जीवनावर तितकासा सखोल परिणाम होत नाही.
माझ्यासाठी बाहेरचे जग अस्तित्वात होते आणि अस्तित्वात नव्हतेही. माझे कुटूंबीय माझ्याशी सह्दयतेने वागत. परंतू त्यामुळे माझे दुःख , माझी बैचेनी नाहिशी होत नसे. त्या भरल्या विशाल घरात माझ्यासाठी परिपूर्ण आनंद नव्हता.
मी माझे विचार , मत , भावना, कविता हळूहळू एका नोटबुकमध्ये लिहायला लागले. त्या लिखाणात माझ्या समाजाविषयी अनेक तक्रारी असत. समाजाने आम्हा स्त्रियांवर ओढलेल्या कोरड्यांमुळे माझे स्त्री मन दुःखी होई आणि हे लिखाणातून मी लिहित असे. स्त्रियांच्या संवेदनशीलतेचा तो आरसा होता. त्याला मी दोन नावं दिले होते "नारी कथा " आणि " एका स्त्रीचे मत ".
माझे धाकटे काका यांचे एक मित्र यांनी माझे नोटबुक वाचले आणि लगेच त्यांनी ते ' भारतवर्ष ' ह्या मासिकाकडे पाठवले. माझे लिखाण लगेच प्रकाशित झाले आणि साहित्यक्षेत्रात क्षेत्रात आणि पंडित वर्गात एकच खळबळ निर्माण झाली. विशेषतः पुरूष वर्गात त्याची फारच तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाली. पुरूषवर्गाचा निषेध करणारी धीट विधाने मी लिहिली होती. समाजात स्त्रियांची स्थिती अशीच होती. स्त्रीला व्यक्ती म्हणून काही अधिकार नव्हते. स्त्रीला समाजात आणि कुटूंबात तिरस्करणीय वागणूक मिळत असे आणि स्त्रीला त्याचा निषेध करण्याचीही संधी दिली जात नव्हती. सामाजिक बाबींमध्ये स्त्रियांना कोणतेही अधिकार दिले जात नव्हते. इतकेच नाही तर स्त्रीला संपत्ती , मालमत्ता ह्यातसुद्धा वारसा अधिकार देण्यात येत नव्हते. ह्या गोष्टी माझ्याही बाबत घडत होत्या म्हणून ही सल मी लिखाणातून मांडत गेले. माझ्या मनात एक सल कायम घर करून होती ती ही की, स्त्रीला मन असते , ते व्यक्त करण्याची संधी तिलाही असायला हवी , स्त्रीला अंतःकरण असते पण तेही कोणी समजून घेऊन प्रतिसाद देत नाही.
सुरूवातीला माझे लिखाण हळूहळू बाहेर येत होते. परंतु लिखाण जसे जसे नाव करू लागले तसा लिखाणाने वेग पकडला. माझ्या लिखाणाची चर्चा आता सगळीकडे होऊ लागली होती. विशेषतः तरूणवर्गामध्ये माझ्या लिखाणाची जास्त चर्चा होऊ लागली होती. बंगाली साहित्य संमेलनात सुद्धा माझ्या लिखाणाने स्थान पक्कं केलं होतं. मी सतत स्त्रियांच्या शोषनाबाबत, अधिकाराबाबत लिहित राहीले. माझ्या लेखणीलाच मी शस्त्र बनवून विधवा स्त्रियांच्या प्रश्नाला वाचा फोडली. त्यासाठी मी वाराणसीला त्यांच्या वस्तीत जाऊन राहीले. वेश्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली त्यासाठी त्यांच्याही वस्तीत बराच काळ राहायला गेले. मी माझ्या शेवटच्या दिवसांपर्यंत कार्यरत राहून लेखणीतून स्त्रियांबद्दल मांडत राहीले, लिहित राहीले. मला अजूनही जगून खूप काही लेखणीतून मांडायचं होतं कारण माझी बौद्धिक शक्ती जागृत आणि तरतरीत होती पण शरीर थकलं होतं. वयाच्या 95 व्या वर्षी मी जगाचा निरोप घेतला पण मी माझ्या साहित्यातून , माझ्या विचारांमधून आजही जीवंत आहे.
©वर्षा पतके थोटे
10/010/2021
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
crossorigin="anonymous"></script>.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा