गुरुवार, ६ जून, २०१९

पत्र सत्तावीस


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
विचार करा..वाचा..
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
27
आज न मला तुला काहीतरी खास सांगायचंय, ऐक तर, ......
माझ्या मैत्रीणीविषयी .....बघ ना म्हणजे कसं असतं ना, माणसाचे पोट भरायला लागले की त्या माणसाच्या नजरेत दोष उत्पन्न होतो. मग त्याला त्या भरल्या ताटात काहीबाही दिसायला लागतं. तसचं काहीसं माझ्या मैत्रीणीबाबतीतही झालंय.
तिला आठवली ती संध्याकाळ. तिचा तिच्या सख्यासोबत झालेला वाद. वाद कसला एकटाच लालबुंद होऊन तिला संशयाच्या कोठडीत उभा करू पहात होता. एकदा या संशय नावाच्या वाळवीने जर का एखाद्या नात्यात घर केले तर, भले भले सिक॔दर ही चितपट होतात. संशय या शब्दासोबतचं बघ मृत्यू फिरतोय की काय असं जाणवतं आणि ते खरं ही आहेच म्हणा ! नात्याचा केव्हाच क्षय होतो म्हणजे खरंतर तो मृत्यूचं ...अरे, त्यापेक्षा स्वतःवर आधी विश्वास ठेवावा. प्रेम माणसाला जसं अंतःरंगातून बदलवतं तसचं त्यातूनच निर्माण झालेले विकार पार धुळीस मिळवतात.
मुळातचं निसर्गाने स्त्री आणि पुरूष दोन व्यक्तिमत्व शरीर आणि मनानेही वेगवेगळी बनवलीत. पण मन बनवतांना दोघांच्याही मनातला थोडाथोडा हिस्सा एकमेकांत मिसळवला, जेणेकरून त्याच्या मनाची तिला जाणीव व्हावी आणि तिच्या मनाची त्याला जाणिव व्हावी. किती सुंदररित्या दोघांनाही एकमेकांत गुंफलय. दोन्ही शक्ती एकमेकांना पुरक जणू! अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा हेच सुचित करत असावी. पण हा अर्थ सोयीस्करपणे तिचा सखा विसरलाय आणि पुरुषी वर्चस्व गाजवू पहातोय.
स्त्रीने थोड्या भावना व्यक्त केल्या, थोडी मनसोक्त हसली, बोलली, मनाप्रमाणे वागली म्हणजे लगेच स्वैराचारी वगैरे ठरतेय का रे ?
तिलाही तिच्या जाणीवांची उमग असतेच. पण आताशा कुठे ती पिंज-यातून बाहेर पडून जाणिवा जगू पाहतेय. तर तिथेही कुठेतरी या संशयाची सुई सारखी तिच्या दिशेने येतेय.
मी एक स्त्री म्हणून तुला स्त्री मनाचं खास गुपित सांगते ऐक!.....स्त्री जाणिवा खूप प्रगल्भ असतात. त्या जाणिवांची संवेदनशिलता त्याची खोली सगळ्यांचा तिला एक स्त्री म्हणून आदर, सन्मान असतो. म्हणूनच या तिच्या विश्वात जो पुरूष तिचा सन्मान, आदर, विश्वास ठेवेल तो तिला लगेच उमजतो कारण हा सिक्स्थ सेन्स तिला देवाने वरदान म्हणून दिलेला असतो. तिच्या या अनमोल अशा या विश्वात त्याच पुरूषाला ती प्रेमाचे अतूटबंध ही बांधू देण्याची परवानगी देते. नाहीतर शरीरापर्यत पोहोचण्यासाठी लग्न हे बंधन पूरेसं आहे. पण मनाचं काय? असे कितीसे लग्न झालेली जोडपी एकमेकांच्या मनापर्यंत पोहचलीत?? ......खरचं नाही सांगता यायचं....
एकदा का तिच्या मनाला एखाद्या पुरूषी मनाने जिंकलं....हो ....हो जिंकणेच म्हणेन मी ते काही सोप्प काम नव्हे.....तो लाख प्रयत्न करेल, पण तिच्या मनाने त्याला स्थान द्यायला हवं.....आणि एकदा का हे स्थान तिच्या मनात पक्कं झालं की, देवांचे देव जरी पृथ्वीवर अवतरले तरी ते ढळायचे नाही.....मग अशावेळी मला सांग माझ्या मैत्रीणीचा सखा तिच्यामनातली जागा या वाईट विकांरामूळे गमवतोय की नाही.........एकदा का मनातनं उतरवलं की पुन्हा ती जागा नाहीच मिळू शकतं.
पण मी मात्र खूप नशिबवान! तू माझ्या या स्त्री विश्वात जन्मोजन्मीच कायम वास्तव्य करत आलास. तुझ्यातलं स्त्री मन आणि पुरूष मन वेगळं नाहीच करता यायचं रे! केवढा तो विश्वास, आदर आणि लाघवी सख्य असणं....एका स्त्रीला यापेक्षा सुख ते काय हवं !
भेटत राहूया जन्मोजन्मी.......असंच संशयाशिवाय .. !!! इतक्याच विश्वासानं ..
मग उगाच का म्हणते मी तुला " विश्रब्ध"
तुझीच,
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा