कैवल्य ---एक अनुभव
==========================
मी आणि माझे कुटूंब एक चेंज म्हणून कुठेतरी दोन तीन दिवस प्रवासाला जाऊयात का ? असा विचार करत होतोच तर मलाच आठवलं उमाताई जोशी यांचे कैवल्य नावाचे रिसाॅर्ट अलिबागला आहे. तिथे जाऊयात का ? त्याप्रमाणे मी उमाताईंशी फोनवर संपर्क साधला. मी आणि उमाताई ''प्रतिभा" या साहित्यिक ग्रुपशी जोडलेलो आहोत. एवढीच काय ती ओळख होती. कधी बोललो नव्हतो की भेटलो नव्हतो म्हणून ताईंना मी वाॅटस् अॅपला मॅसेज टाकला की , मला तुमच्याशी बोलायचे आहे. उमाताईंनी लगेच फोन केला आणि मी अगदी थोडीशी विचारपूस करून त्यांच्या "कैवल्य "रिसाॅर्ट मध्ये थांबायचा विचार घरच्यांशी सल्लामसलत करून पक्का केला. ताईंनी पण कसलाही व्यावहारिकपणा न दाखवता. तुम्ही फक्त कैवल्य मध्ये या हे वाक्य खूप प्रेमाने म्हटले. त्याप्रमाणे आम्ही बॅग उचलून विमानाने मुंबईला पोहचलोही. तेथून अलिबागला कसे जायचे , कुठे फिरायचे ? तीन दिवसाचा हा सगळा प्लॅन विजय जोशी सर म्हणजे उमाताईंच्या मिष्टरांनी आम्हाला फार नीटनेटका आणि विशेष म्हणजे न विचारताही करून दिला. अगदी सुरूवाती पासून म्हणजे फोनवर बोलणे झाले तेव्हापासून मला आपसूकच आपण प्रवासाला न जाता , आपण आपल्याच फार जवळच्या नातेवाईकाकडे जातो आहोत असा फिल यायला लागला. जो नातेवाईक फार काळजी करणारा आहे आणि आपण तेवढेच निर्धास्त आहोत आणि खरंच उमाताईंशी बोलणं झाल्यापासून आम्ही तेवढेच निर्धास्त होतो. प्रत्येकवेळी व्यवस्थित मॅसेज, माहिती, फिरण्याचा प्लॅन , गुगल मॅप यायचा तो विजय जोशी सर यांच्याकडूनच. मी फक्त हो , नाही एवढचं उत्तर द्यायचे. आतून कसलीही अस्वस्थता नव्हती होती ती शांतता आणि एक विश्वास की आपण जिथे राहायला जातोय ती माणसं खूप चांगली वाटताहेत.
ठरल्याप्रमाणे आम्ही मुंबईला पोहचलो. तेथून क्रुझने अलिबागला समुद्री सफर करत निघालो. बरं नुसतंच क्रुझने यायचं असं न सांगता विजय जोशी सर यांनी ..हे पण आवर्जून सांगितल की कोणत्या क्रुझने समुद्री सफर एन्जाय करत येवू शकता. कोणते क्रुझ किती वाजता आहे. अगदी इंत्भुत माहिती त्यांनी फोनवर वारंवार दिली. आम्ही चौघेही म्हणजे आम्ही दोघं आणि दोन मुली मांडव्याला उतरलो तर तिथे आमच्यासाठी आधीच टॅक्सी येऊन उभी होती. जी विजय आणि उमाताई जोशी यांनी पाठवली होती. आम्ही खूप आनंदाने " कैवल्य " फाॅर्म मध्ये पोहचलो. तिथे दोघांनीही आमचं स्वागत खूप आत्मियतेने आणि प्रेमाने फुलं देऊन केलं आणि सोबत ओळखही. बरं आम्ही कधीच एकमेकांना पाहिलं नव्हतं तरी अगदी ज्या माळ्यावर ते राहतात त्याच माळ्यावरची त्यांच्या रूमच्या बाजूची रूम आम्हाला राहायला दिली. आम्ही फ्रेश होऊन जेवायला खाली गेलो तर तिथे समोरच गणपती बाप्पा प्रसन्नपणे हसत होते. मग तर आमचा चौघांचाही विश्वास आणखी पक्का झाला की आम्ही राहण्या - खाण्यासाठी योग्य जागा निवडली आणि ते लगेच खरंही ठरलं. कारण जेवणाची ताट समोर आली आणि ज्या प्रेमाने ते अन्न बनवलं असेल तो स्वभावातला गोडवा त्या अन्नातही उतरला होता आणि उमाताई , विजय सर दोघंही सोबतीला जेवायला बसले आणि आग्रहाने जेवायला वाढत होते. पहिल्याच दिवशी दोघांनीही आमची मनं जिंकली. म्हणतात ना आपलं बनण्यासाठी फक्त आणि फक्त एक क्षण पुरेसा असतो आणि तोच क्षण आम्ही अनुभवला. उमाताई आणि विजय सर यांनी त्यांच्या हौसेखातर " कैवल्य" ला उभारलंय. पण त्याला कुठेही व्यावसायिक टच नाही. आहे तो पारिवारीक टच आणि आपलेपणा तरिही राहण्याची उत्तम व्यवस्था आणि अप्रतिम असे शाकाहारी -मासांहारी कोकणी पद्धतीचे अप्रतिम जेवण. नुसते जेवणंच नाही बरं का !!आग्रहाने केलेली विचारपूस आणि आग्रहाने आपल्याला खाऊ घालणे सुद्धा. बरं इतक्यावरच न थांबता ....उमाताई सकाळ आणि संध्याकाळ जेवणात काय बनवणार हे पण आधीच सांगून ठेवतात आणि चालेल ना !! हा गोड प्रश्नही लगेच पाठोपाठ विचारतात... विशेष म्हणजे सगळं जेवण फार हायजेनिक , आॅरगॅनिक आहे.
दोघंही पती-पत्नी अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व आहेत. बरं प्रत्येक प्रवाशाला ती आपली वाटावीत एवढी सह्रद्यी आहेत. असं म्हणतात की कोणाला जिंकायच असेल तर ...त्याचा मार्ग पोटातून जातो आणि ही म्हण खरंच किती तंतोतत खरी आहे. हा अनुभव " कैवल्य " मध्ये आल्यावर येतो. इथल्या अप्रतिम जेवणासोबत आहे तो दोघांच्याही स्वभावातील गोडवा आणि हाच गोडवा आपल्याला अनुभवायला येतो तो इथल्या काम करणा-या व्यक्तींच्या बाबतीतही. ....कैवल्य च्या सुंदर परिसरात मुलांना खेळायला कॅरम , बॅटमिंटन , झोपाळा, कॅट असे वेगवेगळे गेमसुद्धा आहेत. मोठ्यांना विर॔गुळा म्हणून वाचायला पुस्तके आहेत. पण खरंतर कैवल्यमध्ये वेगवेगळ्या झाडांसमवेत आणि उमाताई विजय सर समवेत वेगळा विरंगुळा लागत नाहीच.... कैवल्य ने आणि तिथल्या माणसांनी उमाताई , विजय सर आणि बाकी काम करणा-या व्यक्तींनी आमच्या मनात घर केले ते कायमचे. माझ्या मुलींना इन फॅक्ट आम्हा चौघानांही घरी जाऊन आल्याचा फील आला. हे मात्र नक्की... असे हे कैवल्य फार्म नागाव रोडवर रोडटच आहे. अलिबागला जाल तर कैवल्यला जरूर जा आणि मग बघा माझा अनुभव तुमचाही होऊन जाईल....हाच अनुभव इथे अनेक लोकांसोबत मोठमोठ्या सेलिब्रिटींनी पण घेतला आहे...ते सुद्धा म्हणतात 'कैवल्य' म्हणजे " एक नितांत शांतीपूर्ण सुंदर अनुभव" आहे............
#वर्षा पतके थोटे
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा